Skip to content

गणना३२

रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत.
म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले,
“अतारोथ, दिबोन, याजेर, निमराह, हेशबोन, एलिआलेह, सेबाम, नबो व बेओन;
हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.”
ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.”
मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?
याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता?
मी तुमच्या पूर्वजांना कादेश-बरनेआपासून देश हेरायला पाठवले तेव्हाही त्यांनी असेच केले होते.
अष्कोलच्या खोर्‍यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले.
१०
त्या दिवशी याहवेहचा क्रोध भडकला आणि त्यांनी ही शपथ वाहिली:
११
‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;
१२
कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ मात्र तो पाहतील, कारण त्यांनी याहवेहला पूर्ण हृदयाने अनुसरले.’
१३
याहवेहचा क्रोध इस्राएलवर भडकला व ज्या पिढीने याहवेहच्या दृष्टीने दुष्टाई केली होती त्या सर्वांचा नाश होईपर्यंत याहवेहने इस्राएली लोकांना चाळीस वर्षे रानात भटकण्यास लावले.
१४
“आणि पाहा, पातक्यांच्या पिल्लांनो, इस्राएलावर याहवेहचा राग आणखी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या पित्याच्या जागी उभे राहिला आहात.
१५
जर तुम्ही याहवेहच्या मागे चालण्यापासून दूर फिराल, तर याहवेह या इस्राएली लोकांना पुन्हा रानात सोडून देतील व तुम्ही त्यांच्या नाशास कारणीभूत ठराल.”
१६
नंतर ते मोशेकडे येऊन त्याला म्हणाले, “येथे आम्ही आमच्या गुरामेंढरांसाठी मेंढवाडे व आमच्या स्त्रिया व लेकरांसाठी नगरे बांधू.
१७
परंतु आम्ही स्वतःला युद्धासाठी सशस्त्र करू व इस्राएली लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहचवेपर्यंत त्यांच्यापुढे जाऊ. तोपर्यंत आमच्या स्त्रिया व लेकरे देशातील रहिवाशांपासून तटबंदीच्या नगरात सुरक्षित राहतील.
१८
प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपले वतन मिळेपर्यंत आम्ही आमच्या घरी परत जाणार नाही.
१९
यार्देन नदीच्या पलीकडे त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही वतन घेणार नाही, कारण आमचे वतन आम्हाला यार्देनेच्या पूर्वेस मिळाले आहे.”
२०
तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही हे कराल, म्हणजे जर तुम्ही याहवेहसमोर युद्धासाठी स्वतःला हत्यारबंद कराल
२१
आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल;
२२
तर जेव्हा याहवेहपुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही परत जा व याहवेहच्या व इस्राएलच्या कर्तव्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश याहवेहसमोर तुमचे वतन होईल.
२३
“परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार.
२४
तुमच्या स्त्रिया व लेकरांकरिता नगरे व तुमच्या गुरामेंढरांकरिता वाडे बांधा, परंतु तुम्ही वचन दिल्याप्रमाणे करा.”
२५
गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू.
२६
आमची लेकरे, स्त्रिया, आमचे कळप आणि गुरे या ठिकाणी गिलआदाच्या शहरांमध्ये राहतील.
२७
पण तुझे सेवक, म्हणजे युद्धासाठी हत्यारबंद झालेला प्रत्येक पुरुष, जसे आमचे प्रभू सांगतात त्याप्रमाणेच युद्धासाठी याहवेहपुढे पार जातील.”
२८
नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली.
२९
मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा.
३०
पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.”
३१
गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे.
३२
आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.”
३३
तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्‍यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.
३४
गाद गोत्राच्या लोकांनी दिबोन, अतारोथ, अरोएर,
३५
अटरोथ-शोफान, याजेर, योगबेहाह,
३६
बेथ-निमराह व बेथ-हारान ही सर्व तटबंदीची नगरे बांधली व त्यांच्या कळपासाठी मेंढवाडे सुद्धा बांधले.
३७
रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली,
३८
याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.
३९
मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले.
४०
म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले.
४१
मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर असे ठेवले.
४२
आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options