Nebuzar-Adan बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.
त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली.
रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटबंदी पाडून टाकली.
नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने शहराच्या विध्वंसातून वाचलेल्या आणि बाबेलच्या राजाला शरण गेलेल्या लोकांना बंदिवासात नेले.
परंतु अधिकार्याने देशातील काही अत्यंत गरीब लोकांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले.
बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि ते कास्य बाबेलास घेऊन गेले.
त्यांनी भांडी, फावडे, चिमटे आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली.
रक्षक दलाच्या अधिकार्याने अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते, काढून घेतली.
याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते.
प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. एका खांबावर कास्याचा कळस होता जो तीन हात उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. नक्षीसह दुसरा खांबही तसाच होता.
रक्षक दलाच्या अधिकार्याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपालांना बंदिवान म्हणून नेले.
जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि पाच राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने नेले.
रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.
हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.
मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला.
परंतु सर्व यहूदाह प्रांतात त्याने अगदी गरीब असलेल्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीही नव्हते त्यांना नबुजरदानने तिथेच राहू दिले व त्यांना शेते आणि द्राक्षमळे दिले.
आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली:
“त्याला ताब्यात घेऊन त्याची नीट काळजी घ्या; त्याला काही इजा होऊ देऊ नका व तो मागेल ते त्याला द्या,”
त्याप्रमाणे गारद्यांचा सरदार नबुजरदान, खोजांचा प्रमुख नबूशजबान व राजाचा सल्लागार नेरगल-शरेसर व बाबिलोनचे इतर उच्चाधिकारी यांनी
सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला.
पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याला, बाबिलोन येथे बंदिवासात यरुशलेम व यहूदीया येथील जे लोक पाठविले जाणार होते, त्यांच्याबरोबर यिर्मयाह साखळदंडात बांधलेला आढळला. तेव्हा त्याने त्याला रामाह येथे नेले, त्याची सुटका केली. यानंतर यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.
पहारेकऱ्यांच्या नायकाला जेव्हा यिर्मयाह सापडला, तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझे परमेश्वर याहवेहने या देशावर हे सर्व अरिष्ट आणण्याचा निवाडा केला होता.
आणि जसे त्यांनी पूर्वी सांगितलेच होते, आता तसा हा अनर्थ ओढवला आहे; हे सर्व यामुळे घडले, कारण या लोकांनी याहवेहची आज्ञा न पाळता त्यांच्याविरुद्ध पाप केले.
आज मी तुझ्या हातातील बेड्या काढून तुला मोकळे करतो. माझ्याबरोबर बाबेलला यावे अशी तुझी इच्छा असेल तर चल. मी तुझा सांभाळ करेन; पण तिकडे यावे असे तुला वाटत नसेल, तर येऊ नकोस. संपूर्ण देश तुझ्यासमोर आहे, तुझ्या मनात येईल तिकडे जा.”
यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.” नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले.