Skip to content

Law बद्दल बायबलमधील वचने

175 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र चांगले आहे—जर त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यात आला तर.

  2. नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे

  3. जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे.

  4. जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे याजक आधी नेमलेले असतात.

  5. जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.”

  6. परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित असलेल्या नवीन कराराचे ते मध्यस्थ आहेत.

  7. जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती.

  8. परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन.

  9. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. ते माझ्या कराराशी विश्वासू राहिले नाही, आणि मी त्यांच्यापासून दूर गेलो, असे प्रभू म्हणतात.

  10. परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.

  11. कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘प्रभूला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,

  12. मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”

  13. त्यांनी या करारास “नवा” असे म्हणून जुना करार कालबाह्य ठरविला आहे; आणि जो कालबाह्य व जुना आहे तो लवकर नाहीसा होईल.

  14. या सर्व गोष्टींवरून पवित्र आत्मा आपल्याला हे निदर्शनास आणून देतात की जोपर्यंत जुना मंडप आणि त्यातील कार्यक्रम चालू होते तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता.

  15. हे वर्तमान काळासाठी उदाहरण आहे, तिथे अर्पण केलेली दाने व अर्पणे उपासकाची विवेकबुद्धी शुद्ध करीत नाही.

  16. हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.

  17. परंतु जेव्हा चांगल्या गोष्टी ज्या आता येथे आहेत त्यांचा महायाजक म्हणून ख्रिस्त आले होते, जो मानवी हाताने केलेला नाही व जो या सृष्टीचा भाग नाही, अशा अधिक महान व अधिक परिपूर्ण मंडपाद्वारे आत गेले.

  18. त्यांनी परमपवित्रस्थानात शेळ्यांच्या आणि वासरांच्या रक्ताद्वारे प्रवेश केला नाही; परंतु स्वतःच्या रक्ताद्वारे एकदाच प्रवेश केला आणि अनंतकाळची मुक्ती मिळविली.

  19. जर शेळ्यांचे आणि बैलांचे रक्त किंवा कालवडींची राख विधिपूर्वक अशुद्ध असलेल्यांवर शिंपडल्यास ते बाह्यतः शुद्ध केले जाते.

  20. तर, सनातन आत्म्याद्वारे ज्याने परमेश्वराला स्वतःस निष्कलंक असे अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त मृत्यूस कारणीभूत असणारी कामे केल्याच्या टोचणीपासून आपल्या विवेकबुद्धीला शुद्ध करून परमेश्वराची सेवा करण्यास किती अधिक प्रवृत्त करेल!

  21. याकारणास्तव ख्रिस्त हे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत, ज्यांना पाचारण झाले आहे, त्यांनी जुन्या करारानुसार जी पापे केली, त्यांच्या शिक्षेपासून मुक्ती मिळावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून त्यांना सोडवावे व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या वारसाचे अभिवचन मिळावे.

  22. कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे.

  23. मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही.

  24. या कारणासाठीच पहिला करार रक्ताशिवाय अंमलात आला नाही.

  25. जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले.