Husbandman बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली व त्यात द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन दुसर्या ठिकाणी राहवयास गेला.
हंगामाचे दिवस आल्यावर फळातून काही मिळावे म्हणून त्याने नोकरांना शेतकर्यांकडे पाठविले.
“परंतु शेतकर्यांनी सेवकांना धरले; एकाला मारले, दुसर्याला ठार केले आणि तिसर्याला दगडमार केला.
मग जमीनदाराने त्यांच्याकडे पहिल्या वेळेपेक्षा जास्त नोकर पाठविले. पण त्यांनाही त्यांनी तसेच केले.
सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’
“पण शेतकर्यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’
त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याचा जीव घेतला.
“आता, जेव्हा द्राक्षमळ्याचा धनी येईल, त्यावेळी तेव्हा तो त्या भाडेकर्यांचे काय करेल असे तुम्हाला वाटते?”
त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्या शेतकर्यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.”
येशूंनी त्यांना म्हटले, “धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’
“यास्तव परमेश्वराचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे लोक फळ देतील त्यांना दिले जाईल.
या खडकावर जे आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”
आपल्याविषयीच या गोष्टीमधून येशू बोलत आहेत हे महायाजक आणि परूशी यांच्या ध्यानात आले,
तेव्हा येशूंना अटक करण्याचा ते काहीतरी मार्ग शोधू लागले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण सर्व लोक येशूंना संदेष्टा मानीत होते.
मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन तो दुसर्या ठिकाणी राहवयास गेला.
हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्यांकडे पाठविला.
परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले.
त्याने दुसरा सेवक त्याच्याकडे पाठविला; पण त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली.
त्यानंतर त्याने आणखी एकाला पाठविले, त्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले.
“आता त्याच्याजवळ पाठविण्यासाठी केवळ ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो त्याचा पुत्र राहिला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले, व तो म्हणाला की, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’
“पण शेतकर्यांनी मालकाच्या पुत्राला येतांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’
त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले.
“द्राक्षमळ्याचा धनी काय करेल असे तुम्हाला वाटते? तो येईल आणि त्या भाडेकर्यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्यांना देईल.