Athens बद्दल बायबलमधील वचने: A city of Greece.
A city of Greece. बद्दल वचने
पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.
त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला.
म्हणून तो सभागृहामध्ये यहूदी आणि परमेश्वराचे भय धरणारे गैरयहूदी या दोघांबरोबर चर्चा करण्यासाठी जाऊ लागला आणि दररोज सार्वजनिक चौकात जे येत होते त्या सर्वांशी वादविवाद करू लागला.
तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता.
नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर चर्चेसाठी बैठकीत आणले व ते त्याला म्हणाले, “तू हे जे नवीन शिक्षण देत आहेस, ते काय आहे, हे आम्हाला समजेल का?
कारण तू आम्हाला अपरिचित असलेल्या गोष्टी ऐकवीत आहेस व त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.”
सर्व ॲथेन्सचे नागरिक व तिथे राहणारे परदेशी लोक, इतर काहीही न करता नव्या गोष्टी सांगणे किंवा ऐकणे यामध्ये आपला वेळ घालवित असत.
पौल अरीयपगाच्या बैठकीमध्ये मध्यभागी उभा राहून म्हणाला: “ॲथेन्सच्या नागरिकांनो! आपण सर्व दृष्टीने अतिशय धार्मिक वृत्तीचे आहात, ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे.
कारण मी बाहेर फिरत असताना, तुमच्या पूजेच्या वस्तूंकडे मी काळजीपूर्वक पाहिले, मला एक वेदीसुद्धा दिसून आली जिच्यावर असा शिलालेख होता: अज्ञात परमेश्वराला. म्हणजे ज्या परमेश्वराला तुम्ही ओळखत नाही त्याची तुम्ही उपासना करता आणि आता त्यांच्याविषयीच मी तुम्हाला सांगत आहे.
“ज्या परमेश्वराने जग व त्यातील सर्वकाही निर्माण केले ते आकाशाचे व पृथ्वीचे प्रभू आहेत, म्हणून ते हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीत;
मानवी हात त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, कारण त्यांना कशाचीही गरज नाही. ते प्रत्येकाला जीव आणि श्वास व लागणारे सर्वकाही पुरवितात.
त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी आधी नेमल्या होत्या.
परमेश्वराने हे यासाठी केले की, लोक त्यांचा शोध करतील आणि कसेही करून त्यांना प्राप्त करून घेतील, वास्तविक ते आपल्यातील कोणापासूनही फार दूर नाहीत.
‘कारण त्यांच्यामध्ये आपण जगतो, वागतो आणि आपले अस्तित्व आहे.’ प्रत्यक्ष तुमच्या कवींपैकी काहींनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपण त्यांची संतती आहोत.’
“यास्तव जर आपण परमेश्वराची संतती आहोत, तर मग आपण असा विचार कधीही करू नये की परमेश्वर म्हणजे मानवाच्या कलाकृतीने व कौशल्याने, सोने किंवा चांदी या धातूपासून अथवा दगडापासून तयार केलेल्या प्रतिमेसारखा आहे.
पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे.
कारण त्यांनी असा एक दिवस ठरविला आहे, त्या दिवशी ते त्यांनी नियुक्त केलेल्या मनुष्याच्या द्वारे या जगाचा न्याय नीतीने करतील. त्यांना त्यांनी मरणातून जिवंत करून या गोष्टींबाबत प्रत्येकाला खात्री करून दिली आहे.”
मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.”
त्यामुळे, पौल त्यांना सोडून निघून गेला.
काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री व इतर काहीजण होते.