Skip to content
1 करिंथकरांस १५:३५-५८

1 करिंथकरांस १५:३५-५८

३५
आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?”
३६
किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही.
३७
तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्‍या कशाचे तरी असते.
३८
मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात.
३९
सर्व देह एकसारखे नसतात: मानवाचा देह एकप्रकारचा, पशूंचा दुसर्‍या प्रकारचा, पक्षांचा एक आणि मत्स्याचा एक.
४०
त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्‍या प्रकारचे आहे.
४१
सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्‍या प्रकारचे आणि तार्‍यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्‍यांचेही तेज वेगवेगळे असते.
४२
अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते.
४३
अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते.
४४
नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे.
४५
असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे.
४६
प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे.
४७
पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता.
४८
जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत.
४९
आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.
५०
माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही.
५१
ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ.
५२
हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.
५३
कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे.
५४
जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”
५५
“अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे?”
५६
कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.
५७
परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
५८
यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options