शास्ते ९:२२-४५
२२
अबीमेलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केल्यानंतर,
२३
परमेश्वराने अबीमेलेख व शेखेमाच्या नागरिकांमध्ये वैर निर्माण केले, ज्यामुळे त्यांनी अबीमेलेखाचा विश्वासघात केला.
२४
यरूब्बआलाच्या सत्तर पुत्रांचा विरोधात केलेल्या अपराधाचा, त्यांचा रक्तपात करण्याचा, त्यांचा भाऊ अबीमेलेख आणि शेखेमाच्या नागरिकांवर ज्यांनी अबीमेलेखाचा त्याच्या बंधूंची हत्या करण्यास साहाय्य केले होते, त्यांचा सूड घेण्यास परमेश्वराने असे केले.
२५
शेखेमाच्या नागरिकांनी त्याच्याविरुद्ध डोंगराच्या माथ्यावर वाटेवर दबा धरण्यास लोक ठेवले आणि त्या वाटेने जाणार्या येणार्या प्रत्येकाला ते लुबाडू लागले आणि हे कोणीतरी अबीमेलेखाचा सांगितले.
२६
मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला.
२७
नंतर ते शेतात गेले आणि द्राक्षे गोळा केली आणि ती तुडविली व त्यांच्या दैवताच्या मंदिरात उत्सव केला. ते खातपीत असताना त्यांनी अबीमेलेखाला शाप दिला.
२८
नंतर एबेदचा पुत्र गाल म्हणाला, “अबीमेलेख कोण आहे आणि आम्ही शेखेमी लोकांनी त्याची चाकरी का करावी? तो यरूब्बआलाचा पुत्र नाही का आणि त्याचा कारभारी जबुल नाही का? शेखेमचा पिता हमोरच्या कुटुंबाची तुम्ही सेवा करा! अबीमेलेखाच्या कुटुंबाची आम्ही सेवा का करावी?
२९
जर हे लोक माझ्या अधिकारात असते तर किती बरे झाले असते! तेव्हाच मी अबीमेलेखाला काढून टाकले असते. मी अबीमेलेखाला म्हणेन, ‘तुझे संपूर्ण सैन्य घेऊन बाहेर पड आणि लढाई कर!’ ”
३०
परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला.
३१
त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत.
३२
म्हणून आता तू आणि तुझे लोक रात्री या आणि शेतांमध्ये दबा धरून बसा.
३३
सकाळी अगदी सूर्योदय झाल्याबरोबर शहरावर स्वारी कर. जेव्हा गाल आणि त्याचे लोक तुझ्याविरुद्ध लढण्यास बाहेर येतील, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी पाहा.”
३४
तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले.
३५
आता एबेदचा पुत्र गाल बाहेर आला आणि शहराच्या वेशीजवळ उभा राहिला, अबीमेलेख आणि त्याचे सैन्य जे दबा धरून बसले होते तेही बाहेर आले.
३६
जेव्हा गालने त्यांना पाहिले, तेव्हा तो जबुलास म्हणाला, “पाहा, डोंगराच्या शिखरांवरून लोक उतरत आहेत!” जबुल त्याला म्हणाला, “नाही, ती केवळ डोंगराची सावली आहे जी तुला माणसांसारखी दिसत आहे.”
३७
परंतु गाल परत म्हणाला: “पाहा, मध्य उंचवट्यापासून लोक खाली येत आहेत आणि दैवप्रश्न करणाऱ्यांच्या एला वृक्षाच्या मागील वाटेने टोळी येत आहे.”
३८
तेव्हा जबुल त्याला म्हणाला, “आता तुझे ते मोठेपणाचे बोलणे कुठे आहे, तू जे बोलला होता, ‘अबीमेलेख कोण आहे की त्याची चाकरी करावी?’ हीच माणसे आहेत ना ज्यांची तू थट्टा केली होती? तर बाहेर जा आणि त्यांच्याशी लढ!”
३९
तेव्हा गालने शेखेमाच्या नागरिकांना लढण्यासाठी नेले व अबीमेलेखाशी तो लढला.
४०
नंतर अबीमेलेखाने त्याचा वेशीच्या प्रवेश दारापर्यंत पाठलाग केला आणि पळून जात असता अनेक मृत्युमुखी पडले.
४१
मग अबीमेलेख अरुमा येथे राहिला आणि जबुलाने गाल आणि त्याच्या भाऊबंदांना शेखेमातून घालवून दिले.
४२
दुसर्या दिवशी शेखेमातील लोक बाहेर शेतात गेले आणि अबीमेलेखाला ही बातमी देण्यात आली.
४३
म्हणून त्याने लोक घेतले, त्यांना तीन तुकड्या मध्ये विभाजित केले व ते शेतांमध्ये दबा धरून बसले. जेव्हा त्याने पहिले की लोक शहरातून बाहेर येत आहेत, तेव्हा त्याने उठून त्यांच्यावर हल्ला केला.
४४
अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला.
४५
संपूर्ण दिवसभर अबीमेलेख शहर काबीज करेपर्यंत शहरावर हल्ला करीत राहिला आणि त्याने त्यातील लोकांचा संहार केला. नंतर त्याने शहराचा नाश केला आणि त्यावर मीठ पेरले.
Settings