दानीएल ११:२१-३५
२१
“त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल.
२२
मग त्याच्यापुढे मोठ्या सैन्याचा नाश होईल; तो आणि कराराचा राजपुत्र दोघेही नष्ट होतील.
२३
त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल.
२४
जेव्हा श्रीमंतांना राज्य सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो त्यांच्यावर आक्रमण करेल आणि असे यश प्राप्त करेल की, त्याच्या पित्याने किंवा त्याच्या पित्याच्या पित्याने प्राप्त केले नसेल. तो धन, लूट आणि संपत्ती आपल्या अनुयायांमध्ये वाटून देईल. तो किल्ले पाडण्याचा कट रचेल—पण फक्त काही काळासाठी.
२५
“प्रचंड सैन्य घेऊन तो दक्षिणेच्या राजाविरुद्ध आपले सामर्थ्य आणि धाडस उत्तेजित करेल. दक्षिणेचा राजाही प्रचंड आणि बलाढ्य सैन्यासह लढेल, परंतु त्याच्याविरुद्ध रचलेल्या कटामुळे तो तोंड देऊ शकणार नाही.
२६
जे राजाच्या मेजावर भोजन करीत असे ते त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील; त्याच्या सैन्याचा नाश होईल आणि बरेच लोक युद्धात मारले जातील.
२७
दोन्ही राजे मनात वाईट गोष्टी घेऊन एकाच मेजावर बसतील आणि एकमेकांशी खोटे बोलतील, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, कारण अंत ठरलेल्या वेळी होईल.
२८
उत्तरेचा राजा पुष्कळ धनसंपत्ती घेऊन आपल्या देशात परत येईल, परंतु त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध राहील. त्याच्या मनाला वाटेल तसा तो वागेल आणि मग आपल्या देशात परत येईल.
२९
“निर्धारित वेळी तो पुन्हा दक्षिणेवर आक्रमण करेल, परंतु पहिल्या दोन प्रसंगी झाले त्याहून अगदी वेगळे परिणाम आता होतील.
३०
पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्यांवर कृपा दाखवेल.
३१
“त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील.
३२
जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील.
३३
“जे ज्ञानी आहेत ते पुष्कळांना शिक्षण देतील, जरी काही काळासाठी, ते तलवारीने मारले जातील किंवा जाळले जातील किंवा पकडले जातील किंवा लुटले जातील.
३४
जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील.
३५
सुज्ञानी लोकांपैकी काही अडखळतील, यासाठी की शेवटच्या वेळेपर्यंत ते स्वच्छ, शुद्ध आणि निर्दोष राहतील, कारण अंत नेमलेल्या वेळी होईल.
Settings