Skip to content

गणना१९

तांबड्या गाईचा विधी

याहवेह मोशे आणि अहरोनला म्हणाले:
“याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.
ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा.
त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे.
एलअज़ार याजकादेखत ती कालवड; तिचे कातडे, मांस, रक्त व आतडे यासह जाळण्यात यावी.
याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा.
त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.
जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
“शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे.
१०
जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा.

मृताच्या स्पर्शापासून शुद्धीकरण

११
“जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.
१२
त्यांनी तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील.
१३
मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.
१४
“एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे,
१५
आणि दोरीने झाकण न बांधलेले प्रत्येक उघडे पात्र अशुद्ध असावे.
१६
“जो कोणी मोकळ्या मैदानात तलवारीने मारलेल्या व्यक्तीच्या शवाला स्पर्श करतो किंवा कोणी नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला किंवा कोणी मानवी हाडाला किंवा कबरेला स्पर्श करतो, त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.
१७
“अशुद्ध व्यक्तीसाठी, जाळलेल्या शुद्धतेच्या अर्पणातून थोडी राख घेऊन ती एका पात्रात घेऊन त्यांच्यावर स्वच्छ पाणी ओतावे.
१८
आणि जो मनुष्य विधीनुसार शुद्ध आहे, त्याने एजोबाची फांदी घेऊन ती पाण्यात बुचकळावी व ते तंबू व त्याची पात्रे आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर शिंपडावे. त्याचप्रमाणे ज्यांनी मानवी हाड किंवा कबर किंवा ज्याचा वध झाला किंवा नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला स्पर्श केला त्यांच्यावरही ते पाणी शिंपडावे.
१९
जो मनुष्य शुद्ध आहे, त्याने अशुद्ध झालेल्या व्यक्तींवर तिसर्‍या व सातव्या दिवशी हे पाणी शिंपडावे आणि सातव्या दिवशी त्याने त्यांना शुद्ध करावे. ज्यांचे शुद्धीकरण होत आहे त्यांनी आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्या संध्याकाळी ते शुद्ध होतील.
२०
पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत.
२१
हा त्यांच्यासाठी कायमचा नियम आहे. “जो मनुष्य शुद्धतेचे पाणी शिंपडतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावीत आणि जो कोणी शुद्धतेच्या पाण्याला स्पर्श करतो तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
२२
अशुद्ध व्यक्ती ज्या वस्तूला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल आणि जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करेल त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options