यिर्मयाह १४:१३-१८
१३
परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ”
१४
त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”
१५
म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.
१६
आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.
१७
“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.
१८
नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”
Settings