Skip to content
प्रेषित २७:२७-३८

प्रेषित २७:२७-३८

२७
चौदाव्या रात्रीस अद्रिया सागराच्या लाटांनी हैराण होऊन हेलकावे खात असताना, मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांना वाटले की आपण एका जमिनीजवळ येत आहोत.
२८
त्यांनी तळ पाहण्यासाठी पाण्यात बुडीद टाकले, तिथे पाणी अंदाजे 37 मीटर खोल असल्याचे समजले; पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा पाण्याची खोली 27 मीटर भरली.
२९
आपले तारू खडकावर आपटेल असे भय वाटल्यामुळे, त्यांनी तारवाच्या मागच्या बाजूने चार नांगर टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करू लागले.
३०
काही खलाश्यांनी होडी सोडून पळून जाण्याचा बेत केला. नाळीवरून म्हणजे जहाजाच्या पुढच्या बाजूने नांगर टाकीत आहोत, असा बहाणा करून त्यांनी होडी खाली सोडली.
३१
परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.”
३२
तेव्हा सैनिकांनी होडीचे दोर कापून ती जाईल तिकडे वाहू दिली.
३३
पहाट होण्यापूर्वी पौलाने प्रत्येकाला अन्न खाण्यासाठी विनंती केली. तो म्हणाला, “आज चौदा दिवसापासून, अनिश्चित अशा मनःस्थितीत तुम्ही उपाशी राहिला आहात, काहीही खाल्ले नाही.
३४
आता मी विनंती करतो की थोडेतरी खा म्हणजे तुमचा बचाव होईल कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या एकाही केसाचा नाश होणार नाही.”
३५
हे म्हटल्यानंतर, मग त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले व ती मोडून खाल्ली.
३६
ते सर्व उत्तेजित झाले व त्यांनी खाण्यास सुरुवात केली.
३७
जहाजात आम्ही सर्वजण मिळून दोनशे शहात्तर लोक होतो.
३८
त्यांनी जेवढे पाहिजे तेवढे खाल्यानंतर, खलाश्यांनी जहाजातील धान्य समुद्रात टाकले व जहाज आणखी हलके केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options